Monday, 17 October 2011

दुर्योधन

महाभारताचा खलनायक म्हणून आपण याला ओळखतो. पण याच खलनायकाच अनुकरण आजवर होत आल आणि जे जिंकले ते जेते ठरले आणि जे हरले ते नष्ट झाले. तरिही आपण त्याला खलनायक म्हणूनच ओळखतो.

त्याची दुसरी बाजू का मांडली गेली नाही आणि त्यावर चर्चाचर्वण का झालं नाही ?

तो हस्तिनापूर महाराज्याचा राजपुत्र होता. जेष्ठ व श्रेष्ठ कौरव होता. का असू नये अभिमान ? का असू नये गर्व ? राजा अंध असूनही राज्याचा उत्कर्ष होत होता आणि त्याचं श्रेय निर्विवाद दुर्योधनाला जातं. कारण तो प्रचंड महत्वाकांक्षी आणि दूरदर्शी होता.
पांडवाच्या इंद्रप्रस्थात, मयसभेत फजिती झाल्यावर स्वाभिमान ( अहंकार नाही ) डिचवला जाणं सहज होतं. याज्ञसेनीचं हास्य आणि शब्द विखारी होते.
" अंधुपत्र दुर्योधन पण आंधळे आहेत हे ठाऊक नव्हतं. "
दुर्योधनाचं मन पेटून उठलं," तात या शब्दाचा अर्थ कळतो का याज्ञसेनीला ? माझ्या तातांच्या व्यंगावर भाष्य करण्याएवढी ती सूज्ञ आहे का? "
{ याज्ञसेनीचा जन्म यज्ञकुंडातून झाला होता आणि द्रुपद तिचा biological पिता नव्हता. }
याज्ञसेनीचं हास्य आणि शब्द सर्वस्वी पूर्वग्रह दूषित आणि चूकीचे होते.

पुढे पांडव द्यूतात हरून वनवासात गेल्यावर दुर्योधनाने हस्तिनापूरात युद्धसामग्रीच्या कार्यशाळा उभारण्यामागे केवढा दूरदर्शीपणा होता. त्याला सदैव हे ठाऊक होतं की पांडव परत आल्यावर सत्तासंघर्ष अटळ आहे. कारण एकाच राज्याचे दोन राजे असूच शकत नाहीत. तसं झाल तर राज्याच विघटन होत जातं. राजा आणि मांडलिक हे समिकरण त्याला मान्य नव्हतं. त्याला पुरेपूर ठाऊक होत की एक जेता असतो आणि बाकीचे जितं असतात. जर त्याच्यासारख्या राजपुत्राने जेता होण्याचं स्वप्न नाही पाहायच तर कोणी पाहायच ?
" माझ्या तातांच्या राज्यावर त्यांचा उत्तराधिकारी म्हणून सर्वस्वी माझाच हक्क आहे. कौरवांच अन्न खाऊन पांडवांचे गुणगान गाणारया या भाटांना काय कळणार या दुर्योधनाची व्यथा आणि वेदना ? "

त्याला खूपच कमी पाठराखे मिळाले. कर्ण, अश्वत्थामा आणि दु:शासन. कर्णावर तर भावाहून अधिक माया आणि विश्वास.
" पांडव अज्ञातवासातून परतल्यावर शिष्टाई करायला कृष्ण आला होता. मी माझ्या राज्याचे तुकडे सहनच करू शकत नव्हतो. मी युद्धाचा पर्याय निवडला. कृष्णाने मला सर्वविनाशकारी युद्धाची कल्पना दिली. पण मला कर्णावर पूर्ण विश्वास होता. आणि म्हणूनच आयुष्यातल सर्वात मोठं द्यूत मी खेळायच ठरवलं. "

" गुरूपुत्र अश्वत्थामा माझा सहकारी. माझ्या सुखदु:खात मोलाची साथ आणि सल्ला देणारा. माझं मन तिघांनाच कळलं. तात, कर्ण आणि अश्वत्थामा. माझ्या दुर्दैवी मृत्यूनंतरही पांडवांचा प्रतिशोध घेण्यासाठी त्यांच्या मुलांचा अंत करणारा. कृष्णाने त्याच्या भालप्रदेशातील मणी काढून घेतला. तो स्फटीक त्याच अस्तित्व होता. परिणामांना अज्ञ नसताना त्याने हे कृत्य केलं आणि तेही तो स्वत: अमर असताना. "

" दु:शासन माझी सावलीच होता. माझ्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द त्याने झेलला. अगदी द्यूतानंतर माझं नैतिक अध:पतन झाल्यावरही त्याने माझी आज्ञा मानून भर सभेत याज्ञसेनीची वस्त्र फेडली. त्यावर भीमाची प्रतिज्ञा ऐकूनही तो तसूभरही हलला नाही. पण माझ्या काळजाचा थरकाप उडाला होता. दु:शासनाच्या युद्धकौशल्याची चिंता नव्हती पण भीमाच्या अमानवी शक्तिची भीती होती. "



* द्रौपदीच्या वस्त्रहरणावरून झालेली टिका अनाठयी वाटते. कारण युद्धात जेथे कृष्णासारख्या नारायणाला कोप आवरला नाही आणि त्याने कर्णावर रथचक्र उगारलं, तेथे दुर्योधन तर साधारण नर होता. आणि त्याचा कोप का अनाठायी असावा?

कर्ण

दाता म्हणून प्रसिद्ध पण याचक म्हणून नेहमीच ओंजळ रिकामी असणारा. ओंजळच काय, मनातले भाव सोडले तर सगळच रिक्त होतं. जन्मदात्या आईने झिडकारलं, जगाने सूतपुत्र म्हणून हिणावलं.
    " माझ्या आयुष्याच्या निर्णायक क्षणी माझी आई, अंह राधाई नव्हे, जन्मदात्री आई, कुंती, माझ्याकडे आली आणि मागितलं तर काय, माझ्या पुत्रांना जीवनदान दे. मग मी कोण ? मी वचन दिलं होतं दुर्यधनाला, अर्जुनवधाचं. आता मी दोन्ही बाजूंनी बांधला गेलो होतो. म्हणून मी सांगितलं, उद्या सूर्यास्तापर्यंत पाचच पांडव जिवंत असतील, मी सोडून किंवा अर्जुन सोडून. "
      त्यावेळी कर्णाच्या मनाची काय अवस्था झाली असेल ? एकीकडे आई भेटल्याचा आनंद तर दुसरीकडे तिचे अन्य सहोदरांवरील प्रेम पाहून त्याचं मन तर प्रेमाला पारखंच राहीलं असेल.
    "  मी तर नेहमीच परका राहीलोय. एक दुर्यधनाची मैत्री सोडली तर माझ्या आयुष्यात काहीच उरत नव्हतं. म्हणूनच तो चूकत असतानाही मी पूर्ण विचारपूर्वक त्याची बाजू घेतली. मी दाता म्हणून प्रसिद्ध असलो तरि एक याचक म्हणून मी नेहमीच रिक्त हस्ते परतलोय. "






* आपल्या सगळ्याच्या मनात कर्ण दडलेला असतो. मी प्रयत्न केलाय माझ्या मनातल्या कर्णाला न्याय देण्याचा.

सामाजिक बांधिलकी म्हणजे काय रे भाऊ ?

खरच काय असतं हे ? कारण आपण लहानाचे मोठे होताना ५६ वेळा ऐकतो हा शब्द. एखादा शब्द वापरताना त्याचा अर्थ माहित असलाच पाहीजे अशी पद्धत अजूनतरी आपल्याकडे नाही आहे. मोठे मोठे शब्द वापरून वजन निर्माण करण आणि अजून मोठे शब्द वापरुन ते टिकवणं महत्वाच.

तर विचारायचा हेतू निर्मळ आहे. मला याचा अर्थ हवाय. कारण बांधिलकी आपण बरयाच नात्यांत पाहतो. रक्ताचीच असतात बहुतेक नाती. मग समाजाच काय? तो मधेच कुठून आला? मी माझ्या समाधानासाठी अर्थ काढलाय पण परत असंख्य प्रश्न निर्माण झालेत. तर मी आधी अर्थ सांगतो आणि प्रश्न विचारतो.

सामाजिक बांधिलकी म्हणजे बहुतेक आपल्या समाजाबद्दल आपुलकी वाटण.  इथेच पहिला प्रश्न येतो. कुठला समाज माझा ? मी ज्या भाषेतला / जातीतला / धर्माचा / देशाचा आहे तो ? मग तर मी ४ समाजात आहे.

१. आधी भाषा - माझी मातृभाषा मराठी आहे आणि मी प्रामुख्याने मराठी व इंग्रजी भाषा बोलतो. मग माझा भाषिक समाज कोणता ? मराठी की इंग्रजी ?

२. माझी जात - माझी जात क्षत्रिय असली म्हणुन मी काय लढायला जात नाही. बाकी कोण क्षत्रिय आहे ते मला माहित नाही. गावात पण १७६० उपजाती. कोणी चौकळशी तर कोणी पाचकळशी. आता दोन्ही जाती क्षत्रियकुलोत्पन्न आहेत, तरी पाचकळशी स्व:ताला श्रेष्ठ समजतात. इतरही जाती आहेत, पण मला पुरेशी माहिती नाही. मग क्षत्रिय हा जातिवाचक समाज कोणता ? आणि तो माझा कसा ?

३. माझा धर्म - माझा धर्म जन्माच्या दाखल्यावर हिंदू आहे म्हणून मी हिंदू. बाकी माझ्यात हिंदुत्ववादी असं काहीच नाही. ना मला हिंदू असण्याचा अभिमान ना मला हिंदू असण्याची लाज !
[ एकदा वाटली होती, गोध्रा दंगलींच्या वेळेला ]
मी गोमांस (beef) खातो. आता मी नास्तिक आहे तर गायीच्या पोटात ३३ कोटी देव असतात, म्हणून गोमांस निषिद्ध आहे अस काही मी मानत नाही. मला सूकरमांसही (pork) वर्ज्य नाही. दोन्ही मी आवडीने खातो.
[ हिंदूंना गोमांस आणि मुस्लिमांना सूकरमांस निषिद्ध आहे, असं म्हणतात. ]
मी जन्माने हिंदू आणि करणीने हिंदू नाही आणि जन्म वा करणीने मुस्लिम पण नाही. मग मी कोण ? आणि माझा धार्मिक समाज कोणता ?

४. माझा देश -  मी इंडियामधे राहतो आणि तरीही माझा देश भारत आहे. इंडिया आणि भारतातला फरक कळण्याच्या कितीतरी वर्ष आधीपासून भारतच माझा देश आहे !
[ आभार - शालेय पुस्तकांतील प्रतिज्ञा (pledge) ] .
आता इंडियन सोसायटी ( Indian society) माझी  की भारतीय समाज माझा ?


माझी सामाजिक बांधिलकी कुठली मग ? आणि ती कुठल्या समाजाप्रति असावी ?



लोभ असावा,

कळावे,
प्राक्तन पाटील

Sunday, 16 October 2011

सार्वजनिक गणेश उत्सव...

मुंबई मधे सार्वजनिक गणेश उत्सव एक cult आहे. राजकीय पक्ष्यांना आपली पकड आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांना आपले प्रिय जोखड दाखवायची सार्वजनिक संधी. तसे आपल्याकडे बरेच सार्वजनिक सण आहेत. पण गणेश बोले तो राजा ना. मग त्याचा सण पण मोठाच हवा. मग वर्गणी म्हणून कोणीही कितीही पैसे हक्काने मागतो, आणि आपण झक्कत देतो. नाही देत म्हटल की देवाच्या अद्यात कोपाची (?) भीती घालून पैसे उकऴले जातात. आणि एखादा नग भेटला की त्याला धमकावून पैसे नाही मिळाले तर परभारे देवाच्या नावावर शाप देऊन मोकळे होतात.
कालचीच गोष्ट घे. दोन इमारती सोडून तिसरया इमारतीत सार्वजनिक गणेश उत्सव असतो. आता त्यांचा आणि माझा काय संबंध? पण ते प्रत्येक घरी जाउन वर्गणी गोळा करून गेले. बर प्रसाद द्यायला तरी येतात का? तर नाही. तुम्ही या आणि प्रसाद घेऊन जा. पण वर्गणी मागायला येणार. माझ्या घरी कोणी नव्हतं म्हणून मला रस्त्यातच धरलं. " चल, वर्गणी दे, १५१ रुपये. " मी म्हटल, "कसली बाबा?" तर एखादंया वेड्याकडे पहाव तस पाहून म्हणतो," सार्वजनिक गणेश उत्सवाची" . मी म्हटल," मी काही देव मानत नाही" . तर म्हणतो," अरे गाढवा, त्याच्याच कृपेने तर दोन सुखाचे घास खातोस ना?"  मी म्हटल,"आईच्या कृपेने खातो" . तर म्हणतो, " मग त्यांना देवाच्या कृपेने मिळालेत अस समज आणि वर्गणी दे." मग मी पण अडून बसलो. पैसे काय झाडावर लागतात होय? आणि लागले तरी याच्यासारख्या फुकट्याना कशाला द्यायचे? मग म्हटल, जरा खेचुया याची. मी विचारला," १५१ कशाला रे? श्रद्धा तर मनात असते ना. मग मी १५१ दिले काय आणि ११ दिले काय देवाला दोन्ही सारखेच ना. की तुमच्या देवाला तुम्ही १५१ ची सवय लावली आहे? " तर म्हणतो, " आमचा देव म्हणजे? हा तुझा पण देव आहे." मी म्हटल," माझा देव मी ठरवणार, तू कोण मला सांगणारा? आणि तसाही हिंदूंमधे ३३ कोटी आहेत. ज्याला जो हवाय त्याने तो घ्यावा. मग एखाद्या देवाची जबरदस्ती कशाला? " त्याने माझ्याकडे भूत पाहाव तस पाहिला आणि म्हणाला," ते तुझा तू ठरव. पण मी वर्गणी घेऊनच जाणार." मग मी म्हटला," पण मी नास्तिक आहे राजा. नास्तिकाचा पैसा तुमच्या देवाला कसा चालेल?" तर म्हणतो कसा," तू असशील नास्तिक, पण पैसा काही आस्तिक वा नास्तिक नसतो."
अर्थात मी काही पैसे दिले नाहीतच. पण मजा सांगाविशी वाटली म्हणून हा लेखन प्रपंच.

कळावे,