भाग १
रात्र काळी घागर काळी
चिंतामण त्र्यंबक खानोलकर लक्ष्मी - एका सुंदर आणि निष्पाप मुलीची स्वप्न उध्वस्त झाली ती तिच्याच दैवी सौंदर्यामुळे. तिचा पुरूष तिच्या सौंदर्याला भुलला नाही पण घाबरला जरूर. जेव्हा लक्ष्मीने त्याच्यातल्या पुरुषाला डिवचलं तेव्हा चवताळून त्याने तिचा बलात्कार केला आणि " चुकार बीज पेरलं गेलं ". पण जेव्हा ती फणा काढून उभी राहिली तेव्हा मात्र तो शेपटात पाय घालून पळाला. " हे शंभर नंबरी सोनं नव्हेच " असं त्याला वाटलं आणि तो जाईकडे (भाविणीच्या मुलीकडे) वळला. त्यामुळे लक्ष्मी मुळातूनच कापल्यासारखी झाली. जे सुख पत्नी (ब्राम्हणाची पोर असूनही) म्हणून तिला नाकारलं गेलं तेच सुख एका भाविणीच्या पोरीला विनसायास मिळालं याची चीड तिच्या मनात कायम राहिली.शरिरसुखासाठी तिने व्यभिचाराचाही आधारही घेऊ पाहिला, पण शापित सौंदर्याच्या जवळपासही कुणी फिरकू शकला नाही. सूर्यावर थुंकण्याची कुणाचीही प्राज्ञा झाली नाही, जळून खाक होण्याची भीती होती.
रात्र काळी घागर काळी मध्ये खानोलकरांनी लक्ष्मी आणि जाई या दोन परस्पर विरोधी व्यक्तिरेखा चितारल्या आहेत. लक्ष्मीला अप्रतिम सौंदर्याचा ठेवा मिळूनही प्रेमाला ती पारखीच राहिली तर जाई एका भाविणीची मुलगी असल्याने दिगंबरला (लक्ष्मीचा नवरा) ती सहजप्राप्त होती आणि त्याने तिचा उपभोग घेतला. (काळानुरूप त्यात काही वावगं नव्हतं). तर जाईची नेहमीच कुचंबणा झाली. दिगंबरला सर्वस्व देउनही ती बहिष्कृतासारखी जगली. कारण ज्या दिगंबराचा अंश ती " पोटी थोराचे बीज " म्हणून वाढवत होती तो गर्भच जिरला.
कादंबरी लिहिताना कोकणाचा जो गूढ माहौल खानोलकरांनी निर्माण केला आहे की वाचता क्षणीच निर्मिकाला मनातून दाद जाते. त्यांनी वर्णनात्मक शैलीचा अवलंब केल्याने कादंबरी प्रवाही झाली आहे. इतकी प्रवाही की बरेचदा ती वाचणारयाला स्वत:बरोबर फरफ़टत नेते. जेव्हा कादंबरी संपते तेव्हा मनासकट बरच काही सुन्न होतं. संवेदना या शब्दाची फोड कशी होते ठाऊक नाही पण सह-वेदना काय असू शकते याचा प्रत्यय येतो.