Friday, 1 June 2012

वार करणाऱ्या तलवारीची धार मोठी कि ती तलवार पेलणारा हात मोठा? त्या प्रमत्त हातातली ताकद मोठी कि त्या हातांमागच भेदरलेलं मन? काहीही असो, सगळ्यांची शेवटी मातीच होते. ज्याप्रमाणे नद्या गोड असूनही समुद्र खारटच असतो. कारण समुद्र साचलेला असतो. तो आपला खारटपणा नद्यांना घ्यायला भाग पाडतो. मग आपण त्या प्रवाहाला खाडी म्हणतो. खारट म्हणून खाडी कि खारट म्हणून अढी?

मनातली अढीच पण अशीच असते ना? लादलेल्या गोष्टींची अढी बनते. मग कालांतराने तिला पीळ पडत जातात. ती अढी दुस्तर बनून बसते. उजीच म्हणतात कि सुंभ जळला तरी पीळ सुटत नाही. कसा सुटेल पीळ? पीळ पडायला जितका वेळ गेला त्याच्या दुप्पट वेळ सुटायला द्यावाच लागेल. अथवा पीळ पडूच देऊ नका. पीळ किंवा अढी फोडायचा प्रयत्न करा. प्रश्न सुटतील किंवा निदान उग्र तरी होणार नाही. आणि त्यांना तोंड हि द्यावं लागणार नाही. 

छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण हवा लागते आणि अढीचा गंज लागतो. मग किती वेळ लागतोय पीळ पडायला? सुरुवातीचा पीळ पडला कि पुढचे पीळ आपोआपच पडतात. नवीन पीळ जितके जास्त तितका जुना पीळ जास्त घट्ट. सोडवू म्हटलं तरी सुटत नाहीत.  

No comments:

Post a Comment